अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा समाजाने जपावा; नगराध्यक्ष सचिन सातव यांचे प्रतिपादन.
संपादक : सुरज देवकाते
बारामती : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मांग-गारुडी समाज संघटनेच्या वतीने बारामती येथे अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमास पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पश्चिम महाराष्ट्राचे सचिव सुनील शिंदे, नगरसेवक राजेंद्र सोनवणे, जय पाटील, सुनील सस्ते, निलेश इंगुले, नगरसेविका संपदा चौधर, नगरसेविका धनश्री बांदल, पत्रकार तैनूर शेख, पत्रकार सुरज देवकाते, पत्रकार ज्ञानेश्वर दुर्वे, सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर पोटरे, शिवसेना पुणे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे, एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष फयाज शेख, राष्ट्रीय टकारी महासंघाचे अध्यक्ष अविनाश गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष सचिन सातव म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते समाज परिवर्तनाचे प्रभावी शिल्पकार होते. त्यांच्या लेखणीतून समाजातील वंचित, शोषित, कष्टकरी आणि कामगार वर्गाचे वास्तव जगासमोर आले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील रचलेला पोवाडा रशियामध्येही गायला गेला, ही बाब त्यांच्या साहित्याच्या जागतिक उंचीची साक्ष देणारी आहे.
ते पुढे म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो किंवा कामगार चळवळ, प्रत्येक ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या विचारांनी आणि साहित्याने मोठे योगदान दिले. दलित साहित्याला स्वतंत्र व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सामाजिक समतेचा आणि न्यायाचा संदेश दिला. “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती श्रमिक, कष्टकरी आणि गोरगरिबांच्या तळहातावर तरलेली आहे,” हा त्यांचा विज्ञानवादी आणि मानवतावादी विचार आजही समाजाला प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. समाजातील नव्या पिढीने त्यांच्या साहित्याचा अभ्यास करून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवावी, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मांग-गारुडी समाज संघटनेचे अध्यक्ष तानाजी पाथरकर यांच्या नेतृत्वाखाली सचिन सकट, शरद पाथरकर, राजू खलसे, पोपट सकट, ओंकार पाथरकर, सनी सकट यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.

✍🏻मुख्य संपादक – सुरज देवकाते





















