जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी; पोलीस प्रशासनाकडे तक्रार..!
संपादक : सुरज देवकाते
बारामती (दि३१) : बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील रहिवासी सुनील लालासाहेब मासाळ यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याकडे दिलेल्या तक्रारीत, आपल्यावर आणि कुटुंबीयांवर नियोजनबद्ध पद्धतीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप करत संबंधित आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ अन्वये जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, सुनील मासाळ यांचे गावातील काही व्यक्तींशी शेतजमिनीच्या कारणावरून वाद सुरू आहेत. २७ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास आरोपींनी शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर तक्रार देण्यासाठी मोटारसायकलवरून जात असताना आरोपींनी चारचाकी वाहनातून पाठलाग करून मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या अपघातात सुनील मासाळ यांना हात, पाय तसेच शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्या भावालाही दुखापत झाली आहे. घटनेनंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, संबंधित पोलीस ठाण्यात या घटनेची केवळ अपघात म्हणून नोंद करण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, हा केवळ अपघात नसून आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून जिवे मारण्याच्या उद्देशाने वाहनाची धडक दिली. त्यामुळे संबंधित आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन या तक्रारीची चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, पीडित कुटुंबाने न्याय मिळावा आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

✍🏻मुख्य संपादक – सुरज देवकाते





















