जमिनीच्या वादातून दाखल झालेल्या गुन्ह्यात पुरावे सिद्ध न झाल्याने न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.
संपादक : सुरज देवकाते
बारामती (दि:११) :बारामती : चाकूने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील चार आरोपींची बारामती येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायाधीश पी. एम. पाटील यांनी हा निकाल देत बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला.
या प्रकरणात पवन सोपान पिंगळे, दशरथ खंडू कोळपे, सोपान बबन पिंगळे आणि देवीदास सत्तू मोटे यांच्याविरुद्ध फिर्यादीवर चाकूने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षाकडून एकूण पाच साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. यामध्ये स्वतः फिर्यादी, दोन वैद्यकीय अधिकारी तसेच दोन पंच साक्षीदारांचा समावेश होता. मात्र, फिर्यादीस झालेली दुखापत आरोपींनीच केल्याचे तसेच जप्त करण्यात आलेला चाकू अथवा कुऱ्हाड या गुन्ह्यात वापरण्यात आल्याचे सरकार पक्षाला न्यायालयात ठोस पुराव्यांद्वारे सिद्ध करता आले नाही. हत्यार जप्ती पंचनामा, वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच इतर महत्त्वाचे पुरावे न्यायालयासमोर प्रभावीपणे सादर करण्यात सरकार पक्ष अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले.
आरोपींचे वकील ॲड. धीरज माणिक लालबिगे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना, जमिनीच्या वादातून आरोपींविरुद्ध खोटी फिर्याद दाखल करण्यात आली असून, बेकायदेशीर जमाव जमवून चाकूने हल्ला केल्याचा आरोप कोणत्याही भक्कम पुराव्याअभावी सिद्ध होत नसल्याचे नमूद केले. त्यामुळे आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली.
बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात ॲड. धीरज लालबिगे यांना ॲड .रुपाली माळवदे, ॲड.दिपाली माळवदे,ॲड. रोहन कांबळे,ॲड धीरज गावडे आणि ॲड.ओमकार क्षीरसागर यांनी सहायक म्हणून काम पाहिले.

✍🏻मुख्य संपादक – सुरज देवकाते





















