संपादक : सुरज देवकाते
आमराई परिसरातील दोन गटांच्या मारामारीप्रकरणी पोलिसांवर बलप्रयोग; भारतीय न्याय संहिता व आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हा, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास वेगात
बारामती (दि:१०): बारामती शहरातील आमराई परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या मारामारीदरम्यान कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरच हल्ला झाल्याची गंभीर घटना शुक्रवारी पहाटे घडली. या प्रकरणी बारामती शहर पोलीसांनी पाच नामनिर्देशित आरोपींसह त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि आर्म्स ॲक्टअंतर्गत कठोर गुन्हा दाखल केला असून, आरोपींविरुद्ध प्रतिबंधक कारवाईचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील आमराई परिसरात दिनांक 10 जुलै 2026 रोजी पहाटे सुमारे 01.30 वा. दोन गटांमध्ये भांडण, मारामारी व गोंधळ सुरू असल्याची माहिती डायल 112 आपत्कालीन सेवा यंत्रणेद्वारे प्राप्त झाली. माहिती मिळताच बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई गिरीश गणपत नेवसे व पोलीस शिपाई तुषार शिंदे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचल्यावर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होऊ नये तसेच सुरू असलेला गोंधळ वाढू नये यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून बेकायदेशीर जमाव पांगविण्याचा, दंगा शमविण्याचा आणि कायदा सुव्यवस्था कायम राखण्याचा प्रयत्न केला.
मात्र आरोपी शुभम भीमराव कांबळे, विपुल अजय अवचिते, शुभम अजय अवचिते, ओम मिथुन पाटोळे, गणेश शंकर पाथरकर व त्यांच्या इतर साथीदारांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर आदेशांचे उल्लंघन करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. आरोपींनी पोलिसांना धमकावून त्यांच्याविरुद्ध फौजदारीपात्र बलप्रयोग केला. या घटनेत पोलीस शिपाई गिरीश नेवसे यांना दुखापत झाली असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी घटनास्थळी धावून गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर झालेला हा हल्ला गंभीर स्वरूपाचा मानला जात आहे. कायदा सुव्यवस्था राखताना पोलीस अधिकारी व कर्मचारी अनेकदा स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात. समाज सुरक्षित राहावा, नागरिक निश्चिंतपणे आपले दैनंदिन जीवन जगू शकावेत आणि कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी पोलीस दल दिवस-रात्र कार्यरत असते.
या प्रकरणी आरोपी शुभम भीमराव कांबळे, विपुल अजय अवचिते, शुभम अजय अवचिते, ओम मिथुन पाटोळे, गणेश शंकर पाथरकर व त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 115(1), 121(1), 132, 195(1), 221, 3(5) तसेच आर्म्स ॲक्ट कलम 4, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपींच्या गुन्हेगारी वर्तनाचा स्वतंत्र आढावा घेण्यात येत असून त्यांच्याविरुद्ध आवश्यक त्या कायदेशीर प्रतिबंधक कारवायांची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आणि लोकसेवकांवर हात उचलणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
सदर गुन्ह्याचा तपास बारकाईने सुरू असून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडिओ, इलेक्ट्रॉनिक पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब तसेच इतर तांत्रिक व वैज्ञानिक पुरावे संकलित करण्यात येत आहेत. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयात सक्षम दोषारोपपत्र सादर करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येत आहे. बारामती शहर पोलीस नागरिकांना आवाहन करीत आहेत की, कायदा सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलिसांना सहकार्य करावे. पोलीस हे समाजाच्या सुरक्षिततेसाठी कार्य करणारे लोकसेवक आहेत. त्यांच्यावरील विश्वास, सहकार्य आणि आदर यामुळेच सुरक्षित, शांततापूर्ण व कायद्याचे राज्य असलेला समाज निर्माण होऊ शकतो. “पोलीसांवर झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून कायद्याच्या अंमलबजावणी व्यवस्थेवरचा हल्ला आहे. कायद्याचा आदर करणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस सदैव तत्पर आहेत आणि कायदा मोडणाऱ्यांविरुद्ध कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल.”
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण . संदीप सिंह गिल, मा. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भंडारे यांच्यावतीने करण्यात येत असून गुन्ह्याचा पुढील तपास बारामती शहर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.

